हिरकणीची शौर्यकथारायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची ।वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे ।राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे ।आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे ।शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे ।सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती ।चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती।एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली।ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली।सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे ।मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे ।हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला।गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला।बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी ।कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी।अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले ।साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले ।कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची ।ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची ।
बीजे
बीजे

No comments:
Post a Comment